क्रुषीमंत्र्याची मोठी घोषणा ; शेतकऱ्यांसाठी सानुग्रह अनुदान योजना ; राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाचा अपडेट आला आहे. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय बरणे यांनी एक मोठी घोषणा केली असून, यानुसार ‘स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना’ आता महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना योजनेसाठी अर्ज करणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आणि अनुदानाचे वितरण करणे ही संपूर्ण प्रक्रिया आता ‘महाडीबीटी फार्मर स्कीम’ अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने पार पाडली जाईल. या बदलामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबांना अनुदानाचा लाभ जलदगतीने मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
या सानुग्रह अनुदान योजनेतर्गत शेतकऱ्यांचा अपघात, सर्पदंश किंवा इतर कारणांमुळे मृत्यू झाल्यास तसेच गंभीर अपंगत्व (उदा. दोन्ही हात-पाय निकामी होणे किंवा डोळा निकामी होणे) आल्यास शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते. ही योजना सरकारने ‘स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने’च्या जागी सुरू केली आहे.
पूर्वीची विमा योजना 2017 पासून सुरू होती, परंतु विमा कंपन्यांकडून दावे मिळणे अत्यंत कठीण झाले होते, ज्यामुळे अनेक प्रस्ताव प्रलंबित राहायचे. त्यामुळे विमा योजनेऐवजी ही सानुग्रह अनुदान योजना शासनाच्या माध्यमातून थेट राबवण्यास सुरुवात करण्यात आली.
यापूर्वी ही योजना ऑफलाइन पद्धतीने राबवली जात असल्याने अनेक अडचणी येत होत्या. शेतकऱ्याचा अपघात किंवा मृत्यू झाल्यावर त्याच्या वारसांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे, आवश्यक कागदपत्रे जमा करणे आणि अर्जात आलेल्या त्रुटींची माहिती मिळणे अवघड झाले होते.
परिणामी अनेक अर्ज तसेच पडून राहत होते आणि शेतकरी किंवा त्यांच्या वारसदारांना वेळेवर सानुग्रह अनुदानाची रक्कम मिळत नव्हती. या सर्व अडचणींवर उपाय म्हणून शासनाने ही योजना आता महाडीबीटीवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अर्ज प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि शेतकऱ्यांसाठी अधिक कार्यक्षम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.